विचारवंतांच्या हत्या: सूत्रधार कोण ?
अंधश्रध्दा निर्मृलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची दि. २०ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे सकाळी हत्या झाली होती. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रासह देशात पडसाद उमटले. या घटनेने समाज हादरुन गेला. त्यानंतर पुरोगामी विचारवंत कॉ. पानसरे, कर्नाटकात एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे सत्र सुरु झाले. विशेष म्हणजे ज्यांची हत्या झाली ते डाव्या विचारांचे होते. अंधश्रद्धा, जुन्या रूढी, धर्मांधता यांवर जनजागृती करणे आणि लोकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत त्यांना शहाणे करण्यात त्यांचा मोठा वाट होता. हे लोक जगातून कायमचे नाहीसे झाले तर आपली दुकानदारी तेजीत सुरु होईल, या उद्देशाने या डाव्या विचारवंताना संपविण्यात आले. पण मारेकरी व त्यांचे सूत्रधार यांना ही कल्पना नाही की, व्यक्ती मारून त्यांचे विचार संपत नसतात. ते विचार अधिकाधिक प्रगल्भ होत जातात. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली, नंतर तीन विचारवंतांची हत्या झाली, हे सर्व गेल्या पाच वर्षात घडले, या विचारवंतांच्या मारेकऱ्यांचा नीट सुगावा लागत नसल्यामुळे समाजात अस्वस्थता पसरली असून डाव्या विचारांची चळवळ पुढे सुरु राहण्यास मोठा अडथळा आला आहे. थोडक्यात, भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना विचार करण्याच्या, मांडण्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली. डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचे मारेकरी सापडले, आता यातूनच काही हत्यांचा तपास लागेल अशी आशा वाटते.नरेंद्र दाभोळकर २० ऑगस्ट २०१३ रोजी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी संभाजी उद्यानामध्ये फिरायला गेले होते. उद्यानामध्ये फिरुन परत जात असताना ७ वाजून २० मिनिटांनी ते ओंकारेश्वर पुलाजवळ आल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळीबार केला. मारेकऱ्यांनी एकूण ५ गोळ्या डॉ. दाभोळकर यांच्यावर झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण पडले. फायरिंगच्या घटनेनंतर हल्लेखोर दुचाकीवरुन पळून गेले. घटनास्थळी पुणे पोलिसांनी धाव घेवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेऊन दुचाकी व हल्लेखोरांची माहिती घेण्याची प्रक्रिया राबवली. सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. गुन्हे शाखेची तपास पथके राज्यात अनेक ठिकाणी रवाना झाली सीसीटीव्हीच्या फुटेजवरून काढलेल्या संशयितांच्या रेखाचित्रावरून पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेर्याचे चित्रीकरण तपासणीसाठी मुंबई,लंडनला पाठविण्यात आले, ८ कोटी फोन कॉल्ससह ई-मेलची तपासणी पोलिसांनी केली. दि.२ सप्टेंबर रोजी बॅलेस्टीक अहवाल आल्यानंतर पोलिसांनी सुमारे १७ जणांची चौकशी करण्यात आली. या तपासाद्वारेच दि.१९ डिसेंबर २०१३ रोजी मनिष नागोरी व खंडेलवाल यांना संशयित म्हणून पकडले. दि. १६ जानेवारी २०१४ रोजी गुन्हे शाखेकडून नव्याने तपास सुरु झाला. तपासात प्रगती होत नाही हे पाहून एसआयटीची स्थापना करून गुन्हे शाखेकडून तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. सुमारे दोन वर्षे उलटल्यानंतर मात्र डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे सुपुत्र डॉ. हमीद दाभोळकर हे मुंबई उच्च न्यायालयात गेले व हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सी.बी.आय.) सोपविण्यात आले. दि. ३१ मे २०१६ रोजी डॉ. विरेंद्र तावडे व सारंग अकोलकर यांच्या घरावर सी.बी.आय. ने छापे टाकले. विरेंद्र तावडेला अटक करण्यात आली. तावडे हा मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयने दावा केला. तावडेचा मडगाव व मिरज दंगलीतही हात होता, असा संशयही सीबीआयने व्यक्त केला. सीबीआयकडून पुणे कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. २०१७ साली सारंग अकोलकर व विनय पवार हे फरार झाले. गौरी लंकेश हत्येप्रकरणी मे २०१८ मध्ये अमोल काळेला पुण्यातून अटक करण्यात आली. काळेकडील वैभव राऊतचा उल्लेख असणारी डायरी सीबीआयने जप्त केली. यानंतर तपासाला वेग आला. त्याच्या डायरीत राज्यातील ३६ जण हिटलिस्टवर असल्याचे निष्पन्न झाले. नालासोपारा, मुंबई येथून हिंदुत्ववादी संघटनेचा वैभव राऊत याच्याकडे मुंबई एटीएसला शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी त्याच्या घर व दुकानात छापा टाकला असता तेथून १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार केलेल्या पिस्टल बॉडी, ३ अर्धवट मॅग्झीन, ७ अर्धवट पिस्टल स्लाईड, १६ रिले विथ स्मिथ मिळून आले. याच दिवशी सातार्याच्या सुधन्वा गोंधळेकर, शरद कळस्करलाही अटक करण्यात आली. दि. १२ ऑगस्ट रोजी सुधन्वा गोंधळेकरकडून बंदूक व पिस्तूल जप्त करण्यात आली. पुणे एटीएसने दि. १४ ऑगस्ट रोजी सुधन्वाच्या सातार्यातील घरावर छापा टाकला. या छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे व नोंदी आढळल्या. कोडवर्डमध्ये असलेले संदेशही जप्त करण्यात आले. त्याच दिवशी एटीएसने सचिन अंदुरेला डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक केली. दि. १६ ऑगस्ट रोजी अंदुरेला पुन्हा चौकशी करून सोडले. त्याच दिवशी रात्री सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर सचिन अंदुरे हा प्रत्यक्ष कटात सामील असल्याचा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात रविवारी दि. १९ ऑगस्ट २०१८ ला केला. त्याला पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे दिले होते. याबाबत तपास करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी अंदुरेला २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. डॉ. दाभोळकर हे ‘अंनिस’च्या माध्यमातून हिंदू परंपरेविरोधात बोलत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांना त्यांना संपवायचे होते. त्यासाठी डॉ. दाभोलकर यांचा दिनक्रम काय होता, या सर्व बाबींची माहिती हत्येची कबुली दिलेल्या शरद कळसकरने दिली होती. यामध्ये गोंधळेकरने कळसकरला डॉ. दाभोळकर यांच्या ‘रेकी’साठी मदत केली असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संशयित मारेकऱ्यांना सीबीआयने अटक केली असल्याने तपासाला निश्चित दिशा मिळाली आहे. तपास यंत्रणेने एवढ्या पुरते सीमित न राहता याच्या मागचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, त्याच्यापर्यंत तपास यंत्रणेने पोहोचावे, अशी अपेक्षा आहे. -अशोक सुतार

No comments:
Post a Comment