शेतकर्यांच्या महत्वपूर्ण मागण्या, लोकपाल व
लोकायुक्तांची नियुक्ती, निवडणूक सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी
दिल्लीतील रामलीला मैदानावर गांधीवादी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेली सात दिवसांपासून आमरण उपोषणास बसले होते. अण्णांची तब्येत चिंताजनक झाल्यानंतर केंद्रातील
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची धावपळ उडाली. अखेर अण्णांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा पंतप्रधान कार्यालयाने अखेर तत्वतः मान्य केला. केंद्र सरकारने मागण्या मान्य केलेला नवीन मसुदा
अण्णांना महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत पाठविला होता. हा मसुदा अखेर अण्णांनी मान्य केला व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारळपाणी पिऊन आपले उपोषण सोडले. अण्णांनी
केलेल्या 11 मागण्या केंद्र सरकारने तत्वतः मान्य केल्या आहेत. अण्णांच्या
मागणीनुसार कृषिमूल्य आयुक्तांच्या स्वायत्तेवर उच्चस्तरीय समिती स्थापन केली
जाणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या
बहुतांश मागण्या मान्य करत असल्याची घोषणा केली. गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणामुळे अण्णांचे वजन साडेपाच
किलोने घटले. अण्णा गेली सात दिवस उपोषणाला बसले होते, त्यांना
देशातील विविध थरांतून समर्थन मिळाले. परंतु अण्णांनी काही वर्षांपूर्वी रामलीला
मैदानावर केलेल्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद मोठा होता. तशी गर्दी आता दिसली
नाही. अण्णांसारखे मोजके लढाऊ बाण्याचे काही लोक देशात आहेत म्हणून सरकारवर अंकुश
आहे, असे वाटते. अण्णांनी राजकीय लोकांना आंदोलनास्थळी येण्यास मज्जाव केला होता.
त्यामुळे अण्णांवर अनेक जण नाराज झाले असले तरी अण्णांच्या लढ्याला अखेर यश मिळाले
आहे. अण्णांनी एकट्याने लढा उभारून, देशातील नागरिक सरकारशी लढा देऊन यश मिळवू
शकतो हे सिद्ध केले. या उपोषणाकडे मिडियाने पाठ फिरवली होती. तरीही अण्णांनी लढा
दिला. असो. अण्णांच्या लढावू बाण्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. अण्णा हजारे यांचे दिल्लीत गेली सात दिवस
उपोषण सुरु होते. अण्णांचे हे काही पहिलेच उपोषण नव्हते. त्यांची तब्येत
खालावली आणि विशेष विमानाने मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले. जनलोकपाल, लोकपाल आणि लोकायुक्ताची नेमणूक, शेतमालाला
हमीभाव, कृषीमूल्य आयोगास स्वायत्तता आणि निवडणूक सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीतील
रामलीला मैदानावर अण्णांनी आंदोलन केले. काही वर्षांपूर्वी अण्णांनी याच जागेवर
आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी अरविंद केजरीवालसहित देशातील अनेक आंदोलक
सहभागी झाले होते. देशभरातून अण्णांना मोठा पाठींबा मिळाला होता. परंतु त्यावेळी
अण्णांसोबत राहून केजरीवाल व अनेक जणांनी ‘आम आदमी पार्टी’ हा नवा राजकीय पक्ष
स्थापन केला. नागरिकांच्या प्रश्नांसाठी चालविल्या जाणाऱ्या संघटनेची वाटचाल
राजकारणाकडे जावी, हे अण्णांना पसंत नव्हते. परंतु अण्णांचे अनेक शिष्य त्या
सोप्या, प्रसिद्धीच्या मार्गाकडे गेले. असो. ते अन्नाचे वैयक्तिक मत आहे. प्रत्येक
चळवळीचा अंत राजकीय वाटचालीकडे गेलाच पाहिजे, असे नाही. परंतु तसे झाले. त्यामुळे
कदाचित या आंदोलनाचा फायदा घेऊन कोणी आपला राजकीय फायदा करून घेऊ नये, अशी
अण्णांची इच्छा असावी. अण्णांनी आंदोलन सुरु केल्यानंतर गुजरातेतील पाटीदार
समाजाचा नेता हार्दिक पटेलने अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले. बरेच
शेतकरी बांधव हार्दिक पटेल यांच्यासोबत होते.परंतु अण्णांनी राजकीय व्यक्तींना
बाजूला ठेवले. यानंतर अण्णांवर हार्दिक पटेल यांनी, अण्णा हे आर. आर. एस. व
भाजपाच्या म्हणण्यानुसार आंदोलन करत असल्याची टीका केली. परंतु अण्णांनी ‘एकला चलो
रे’ असे म्हणत प्रखर आंदोलन सुरु केले. पंतप्रधान कार्यालयाचे अण्णांच्या
आंदोलनाकडे लक्ष होते, असे वाटते. अण्णांची तब्येत जसजसी चिंताजनक होऊ लागली तसे
सरकार जागे झाल्याचे दिसून आले. असो. उशिरा का होईना सरकारला जाग आली.पंतप्रधान
कार्यालयाने अण्णांच्या मागण्या मान्य केलेला नवीन मसुदा अण्णांकडे पाठविला, हा मसुदा अखेर अण्णांनी मान्य केला. या
सत्याग्रह आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी देशभरातील पाच हजार शेतकर्यांनी रामलीला
मैदानावर धडक दिली होती. राळेगणसिद्धी येथेही ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा
इशारा दिला होता. अखेर अण्णांच्या आंदोलनापुढे सरकार नमले.
अण्णांनी आपल्या एका संदेशात म्हटले आहे कि, ‘आपल्या मागण्या
समाजहिताच्या व राष्ट्रहिताच्या आहेत. सोशल मीडियावरून आपल्यावर चिखलफेक केली जात
असून, अशी टीका पचविण्याची मला सवय झाली आहे. शेतकरी, समाज आणि
राष्ट्रासाठी केलेल्या मागण्या हे सरकार मान्य करत नसेल तर देशासाठी शहीद होण्यास
आपण तयार आहोत.’ या आंदोलनात ज्येष्ठ विधिज्ज्ञ शांती भूषण, करणी सेनेचे प्रमुख कालवी, मेजर हिमांशू
यांनीदेखील सहभाग घेतला. गुरुवारी सकाळी अण्णांनी आंदोलनाच्या कोर कमिटीची बैठक
बोलावली. या बैठकीत पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या सुधारित मसुद्यावर चर्चा
करण्यात आली. अण्णांची प्रकृती आणखी ढासळली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीतीदेखील व्यक्त
होत होती. पाचव्या
दिवशी गिरीश महाजन यांनी अण्णांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, लेखी आश्वासनावर
अण्णा ठाम राहिले होते.अण्णांच्या प्रकृतीबाबत असलेली चिंता पाहाता, हा मसुदा मान्य
करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पंतप्रधान
नरेंद्र मोदी सरकारने अण्णांना आंदोलन करायला भाग पाडले. स्वतः पंतप्रधान अण्णांची
भेट घ्यायला येऊ शकले असते, परंतु महाराष्ट्राच्या जलसंपदामंत्र्यांशी त्यांना वाटाघाटी करायला लावून
अण्णांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. सरकारमधील कोणी मोठा
लोकप्रतिनिधी आंदोलनाकडे फिरकणार नाही याचीही काळजी सरकारने घेतली. या
आंदोलनाकडे प्रसारमाध्यमांनीदेखील पाठ फिरविली. त्यामुळे सरकारविरोधात
शेतकरीवर्गात मोठा रोष निर्माण झाला आहे. मीडिया दिवसभरातून जास्त
वेळ मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रसारित करतो;
पण अण्णांचे आंदोलन, दखल न घेणारे सरकार व
त्यांनी सर्वसामान्यांसाठी
केलेल्या मागण्या यांची दखल मीडिया घेऊ शकला नाही, हे विशेष म्हटले पाहिजे.
– अशोक
सुतार

