Wednesday, 30 January 2019

भाजपसमोर कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे आव्हान


       भाजपसमोर कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे आव्हान

२०१४ साली मोदी लाट आली, त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या साडेचार वर्षांत बऱ्याच ठिकाणी कमळ फुलल्याचे दिसले. सांगली जिल्हा परिषदेत भाजपने कॉंग्रेस व राष्ट्रवादीला चीत करत मुसंडी मारली. सांगली जि. प. मध्ये कमळ फुलल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पराभवाचे आत्मपरीक्षण केले असेलच. नाही असे नाही. परंतु कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सुंदोपसुंदीमुळे कमळाला पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करणे सोपे झाले, हे मात्र खरे. त्यावर दोन्हीकडील नेत्यांनी सुबुद्धपणे विचार करण्याची खास गरज आहे. आत्तापर्यंत असा विचार झाला नसेल, तर तसा विचार पुढील भवितव्यासाठी व्हायला हरकत नाही. अलीकडच्या काळात दोन्ही काँग्रेसमध्ये एकत्र लढण्याएवढी  राजकीय ऊर्जा आली असल्याने भाजपला पश्चिम महाराष्ट्रात कमळ फुलवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार आहे. नुकत्याच कराडजवळील मलकापूर नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे काका- बाबा गट एकत्र झाले, त्याचा परिणाम म्हणजे कॉंग्रेसने एकहाती सत्ता प्राप्त केली. परंतु मलकापूरमध्ये हे दोन गट एकत्र आले नसते तर भाजपने बऱ्याच जागा पटकावल्या असत्या, हे निश्चित. कराड नगरपालिकेत यापूर्वी राष्ट्रवादी- कॉंग्रेसच्या वाढलेल्या दरीमुळे भाजपने सत्ता प्राप्त केली होती. जिथे जिथे कॉंग्रेस व राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी सुरु आहे, तिथे भाजपने चांगलाच शिरकाव केला आहे. हे राजकारण आहे; जो ते चांगले जाणेल त्यालाच विजय मिळेल. राजकारणात वेळप्रसंगी काय करावे, आपल्या वर्तनात कसा बदल करायचा आणि आपले इप्सित कसे साध्य करायचे याची जाणीव नसेल तर राजकारणात फक्त एकमेकांची उणीधुणी काढायला कोणी येण्याची गरज नाही. राजकारण अशा लोकांचा प्रांतच नव्हे. गेल्या चार वर्षांतील राज्यातील भाजपचा घटलेला जनाधार ओळखून लोकसभा, विधानसभेच्या मतदारसंघात भक्कम बांधणी करण्यासाठी अनेक भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या रणनीतीची तयारी सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी कंबर कसली आहे. ना. चंद्रकांतदादांकडे भाजप नेतृत्वाने पश्चिम महाराष्ट्रातील जबाबदारी सोपली आहे.             पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचे वर्चस्व असलेला भाग म्हणून ओळखला जातो. साखर कारखानदारीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन सुखी झाले त्याचप्रमाणे साखरसम्राट लोकप्रतिनिधींच्या जीवनातही सुख आले. सहकार चळवळीचा पुरेपूर वापर करत अनेकांनी राजकारणात मक्तेदारी बनवली. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रामुख्याने आहेत. पण २०१४ च्या मोदी लाटेत  ही मक्तेदारी बऱ्याच अंशी संपुष्टात आली. काहीजण चक्क भाजपलाच जाऊन मिळाले. मोदी लाटेत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भल्याभल्या नेत्यांना पराभूत व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसून आले. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्याने नंतर दोन्ही काँग्रेसमधील अनेकांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. यामुळेच भाजपला पश्चिम महाराष्ट्रात व राज्यातील  नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले. काँग्रेसच्या या पट्ट्यात भाजपने शिवसेनेलाही मागे टाकले. भाजपने पश्चिम महाराष्ट्रात पावले टाकण्यास सुरुवात केली आहे, परंतु या निवडणुकीच्या पूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र सज्ज झाली आहे.                                                                                      भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या १० आणि विधानसभेच्या ५६ मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.  भाजपचे  पुणे, सांगली व सोलापूर येथे खासदार आहेत. भाजपची शिवसेनेशी युती झाली तर त्यांच्या कोल्हापूर, सातारा, शिरूर व मावळ हे चार मतदारसंघ वगळता पुणे, सांगली, सोलापूर येथे काँग्रेसशी मुकाबला करावा लागणार आहे. त्यादृष्टीने भाजपने बांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेशी युती झाली नाहीं तर अन्य सात मतदारसंघांतही सज्जता ठेवली आहे. कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यक्रम देऊन त्यांना निवडणूक होईपर्यंत गुंतवून ठेवले आहे. यावेळची निवडणूक पक्षीय संघटनात्मक बांधणी याच्या जोरावर भाजप जिंकेल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेहनत घेतली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा पट्ट्यात त्यांनी जनसंपर्क मोठा ठेवला आहे. त्यांच्याकडे सहकार खाते असताना सहकारातील राष्ट्रवादी व काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही सहकारी बँकांचे उदाहरण डोळ्यांसमोर आहे. चार लोकसभा आणि २६ विधानसभा मतदारसंघ नजरेसमोर ठेवून भाजपने आपल्या राजकीय चाली सुरु ठेवल्या आहेत. सांगलीत काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा लाभ उठवून संजयकाका पाटील यांना पुन्हा संसदेत पाठवण्यासाठी त्यांनी तयारी चालवली आहे. सातारा येथे  खासदार उदयनराजे भोसले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क वाढला आहे. कराड विधानसभेच्या दोन आणि सातारा शहर अशा तीन मतदारसंघात प्रस्थापितांना शह देण्याची रणनीती भाजपने ठरवली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अतुल भोसले, बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात मनोज घोरपडे आणि साताराम्य़ात शिवेंद्रराजे भोसले यांच्याविरोधात दीपक पवार यांना भाजपतर्फे ताकद दिली जात आहे. माण- खटाव मध्ये कॉंग्रेसच्या  जयप्रकाश गोरे यांच्या विरोधात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, शेखर गोरे तर कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांच्या विरोधात महेश शिंदे अशा लढती करण्याचे मनसुबे ना. चंद्रकात दादा पाटील यांनी आतापासूनच रचले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात  मिशन लोटस यशस्वी होण्यासाठी भाजपमध्ये येणाऱ्या व असलेल्या उमेदवारांना भाजप नेतृत्वातर्फे मदत केली जात आहे. कोल्हापुरातील दोन आणि सांगलीतील चार विधानसभा मतदारसंघात यशाची पुनरावृत्ती व्हावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहे. सद्यस्थितीत भाजपएवढी संघटनात्मक बांधणी अन्य पक्षांकडे नाही. भाजपमध्ये दुसऱ्या पक्षांतून येणाऱ्या उमेदवारांची कुमक निवडणुकीसाठी लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आघाडी करून निवडणुकीत उतरणार असल्याने  त्यांचे आव्हान भाजपला सोपे राहणार नाही. मोदी लाटेत सत्ता गमावल्यामुळे आलेली मरगळ झटकत कॉंग्रेस व राष्ट्रवादी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. परंतु दोन्ही काँग्रेसमध्ये संघटनात्मक बांधणीचा अभाव दिसतो, तो सुधारणे गरजेचे आहे. कर्नाटक आणि पाच राज्यातील कॉंग्रेसच्या यशाने उभय काँग्रेसमध्ये विरोधकांना आव्हान देण्याची ऊर्जा मिळाली आहे. त्यात मोदींची लोकप्रियता पूर्वीसारखी राहिली नाही. भाजपचे विकासाचे चित्र प्रत्यक्षात अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे भाजपला कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे असलेले आव्हान कडवे असेल, हे निश्चित. 

                                              अशोक सुतार 



Tuesday, 29 January 2019

प्रियंका गांधींच्या निमित्ताने घराणेशाहीची पुन्हा चर्चा


प्रियंका गांधींच्या निमित्ताने घराणेशाहीची पुन्हा चर्चा
अशोक सुतार



प्रियंका गांधी यांची अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रियंका यांच्या निवडीवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियंका गांधी यांचे नाव न घेता, काही लोकांसाठी परिवारच पक्ष असतो, अशी टीका केली. मोदी यांनी असे म्हणून कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली आहे. त्यामुळे देशभर कॉंग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
           प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रियतेबद्दल बिहारमधील एक मंत्री आणि भाजपा नेते विनोद नारायण झा यांनी म्हटले आहे की, प्रियंका गांधी फक्‍त दिसायला सुंदर दिसतात; परंतु त्यांचे कर्तृत्व काहीच नाही. भाजपचे काही नेते, कॉंग्रेस हा पक्ष एका कुटुंबाचा असल्याची टीका नेहमी करतात. प्रियंका गांधी यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्‍ती झाल्यानंतर मोदी यांनी भाजपाच्या इत्तर नेत्यांची री ओढत कॉंग्रेसवर टीका केली. मोदींनी कॉंग्रेसकडे एक बोट दाखवले परंतु त्यांच्याकडे चार बोटे आहेत हे विसरू नये. कॉंग्रेसवर टीका करताना मोदी भाजपा पक्षातील घराणेशाहीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत का, हे पाहणे गरजेचे आहे.                                                                                                                                                                     जरी भाजपाकडून कॉंग्रेसवर घराणेशाहीचे आरोप होत असले तरी भाजपमध्येही घराणेशाही अस्तित्वात आहे. कॉंग्रेसमध्ये उघडपणे घराणेशाहीचे दर्शन दिसते तर भाजपामध्ये कॉंग्रेसच्या तुलनेत ती कमी प्रमाणात दिसून येते. कॉंग्रेसमध्ये एकाच कुटुंबाचे चालते; परंतु भाजपमध्ये घराणेशाहीचे कॉंग्रेसप्रमाणे केंद्रीकरण झालेले नाही. परंतु भाजपमध्ये घराणेशाही अनेक ठिकाणी आहे. ती प्रत्येक पक्षात असते. त्यामुळे कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. भाजपमधील घराणेशाहीची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरपंत फडणवीस हे विधानपरिषदेचे सदस्य होते. देवेंद्र फडणवीस यांची काकी शोभा फडणवीस या महाराष्ट्रात मंत्री होत्या. राज्याचे माजी मंत्री व भाजपचे अजूनही नेते असलेले एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.                                               भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे या राज्यामध्ये मंत्री आहेत. तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीड मतदारसंघातून मुंडेंच्या कनिष्ठ कन्या प्रितम यांना लोकसभेवर पाठवण्यात आले आहे. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. भाजपचे नेते विजयकुमार गावित यांची कन्या हिना गावित या 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.          गावित यांचे बंधू राजेंद्र गावित हे गतवर्षी मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत सिंग हे थौरपूरमधून खासदार आहेत. वसुंधराराजेंची बहीण यशोधराराजे सिंधिया या मध्य प्रदेशातील शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. वसुंधराराजे यांच्या आई विजयाराजे या पूर्वी जनसंघापासून राजकारणात होत्या. भाजपच्या स्थापनेपासून पक्षबांधणीमध्ये विजयाराजे यांचा वाटा आहे. एवढेच काय वसुंधराराजे यांचे बंधू माधवराव सिंधिया हे कॉंग्रेसमधील बडे नेते होते.                                                                     माधवराव यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया हे सध्या मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे खासदार आहेत. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचे पुत्र अभिषेक हे लोकसभेचे खासदार आहेत. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रेम कुमार धुमाळ यांचे पुत्र अनुराग ठाकूर हे हमीरपूरचे खासदार आहेत. माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचे पुत्र पर्वेश वर्मा हे दिल्ली पश्‍चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंग यांचे पुत्र राजीव सिंग हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. भाजपशी सलगी असलेले महंत अविद्यनाथ यांनी आपले वारस म्हणून योगी आदित्यनाथ यांना पुढे आणले. ते उत्तर प्रदेशाचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.                                                                                                        एका आकडेवारीनुसार, 16 व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीच्या माध्यमातून निवडून आलेल्या भाजप खासदारांच्या यादीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र असा अनुक्रम लागतो. मोदींच्या मंत्रिमंडळातील 75 पैकी 15 नेते हे राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी त्यांना कौटुंबिक राजकीय पार्श्‍वभूमी आहे. घराणेशाहीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली, ते निवडून आले. भाजपच्या देशातील 10 मुख्यमंत्र्यांपैकी 3 मुख्यमंत्री हे घराणेशाहीच्या माध्यमातून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले आहेत. सध्या लोकसभेत 22 टक्के सदस्य हे घराणेशाहीमुळे निवडून आले आहेत. कॉंग्रेसप्रणीत संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात घराणेशाहीमुळे निवडून आलेल्या सदस्यांचा आकडा तीस टक्‍के होता.                                                                      भाजपमधील सुमारे 44 टक्‍के खासदार हे घराणेशाहीमुळे लोकसभेत निवडून आल्याचे निरीक्षण हॉंगकॉंग विद्यापीठातील अभ्यासक रोमन कार्लेव्हॅन यांनी नोंदवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही घराणेशाहीचे वर्चस्व दिसून येते. प्रत्येक पक्ष यात अग्रेसर आहे. त्यामुळे कॉंग्रेसवर घराणेशाहीची टीका करणे हे कोणत्याही पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला शोभणारे नाही. घराणेशाही फक्‍त कॉंग्रेसमध्येच आहे, असे भासविण्याचा प्रयत्न करणारे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत, असे दिसते. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी आपल्या कार्यशक्‍तीचा वापर करण्याची गरज आहे, लोकांची या मुद्द्यावर दिशाभूल करणे चुकीचे वाटते.

Friday, 11 January 2019

धर्म देवळांचा की मानवतेचा ?




 धर्म देवळांचा की मानवतेचा ?


     कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचे मोठे प्रस्थ आहे. पुजाऱ्यांच्या भुमिकेमुळे आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. केरळमधील शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रियांना जाण्यास बंदी या विषयावरूनही बरेच रणकंदन झाले आहे. शबरीमला येथे भाजप व आर. आर. एस. च्या कार्यकर्त्यांनी सामाजिक शांततेचा भंग केला. काहींनी बाँम्बफेकही केली. पुजाऱ्यांच्या भुमिकेबद्दल अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. छत्रपती शाहु महाराजांच्या काळातही अंबाबाई मंदिरात शुद्र जातीतील (तत्कालिन धर्माच्या ठेकेदारांनी ठरवलेल्या शुद्र जाती) लोकांना मंदीर प्रवेश नाकारला होता, ही बाब राजर्षी शाहु महाराजांना माहित नव्हती. त्यावेळी केशव ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्याप्रबोधनपाक्षिकमध्येअंबाबाईचा नायटाअसे शीर्षक असलेला परखड अग्रलेख लिहिला होता. त्यात करवीरनगरीचे पालक छत्रपती शाहू महाराजांना जबाबदार धरून प्रबोधनकारांनी जोरदार टीका केली होती. परंतु शाहू महाराजांनी याची दखल घेउन तत्कालिन शुद्रांना अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले केले होते. आज या घटनेला सुमारे ९० वर्षे होऊन गेली असतील, परंतु मंदिराच्या पुजाऱ्यांच्या वर्तनात काहीही फरक दिसत नाही. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात सोवळं न नेसल्याने एक वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर व त्यांच्या सहकार्यांना मंदिराच्या गाभार्यात प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली होती. श्रमिक मुक्ती दलाचे नेते भारत पाटणकर, त्यांच्या पत्नी गेल ऑम्वेट यांनी सोवळे नेसण्यास नकार दिल्याने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले होते. असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. सध्या शबरीमला मंदिरात स्त्रियांच्या प्रवेशाला मनाई केल्यामुळे वातावरण तापले आहे. तेथील धर्मवाद्यांनी वातावरण बिघडवून ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्त्रियांना मंदिरात प्रवेश देण्याचा आदेश देनही धर्मवादी त्याला विरोध करतात. यामुळे न्यायव्यवस्था मोठी की संकुचित धर्मव्यवस्था मोठी हा प्रश्न आता निर्माण हो लागला आहे.  काही जणांनी शबरीमला मंदिर परिसरात बाँबस्फोट केल्याची बातमी नुकतीच घडली आहे. असे वातावरण बरे नव्हे. शबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश द्यावा, असे सर्वोच्च न्यायालय आदेश देते. परंतु सप्टेबरपासून धर्मवाद्यांनी स्त्रियांना प्रवेश करण्यापासून रोखले आहे. यावर देशातील हिंदू लोकांनी स्पष्ट विचार मांडणे गरजेचे आहे. न्यायव्यवस्थेला महत्व द्यायचे की जुनाट बुरसटलेल्या व्यवस्थेला महत्व द्यायचे हे ठरले पाहिजे. कोल्हापुरची अंबाबाई देवी महाराष्ट्रातील अनेकजणांची आद्य माता, कुलस्वामिनी आहे. वाडवडिलांपासून अनेक जण तिचे दर्शन घेत आहेत. शिर्डी, पंढरपूर येथे देवाचे दर्शन घेण्यापासून रोखले जात नाही. पण कोल्हापूरच्या अंबामाता मंदिरात जाण्यापासून पुजारी रोखत आहेत. सोवळ्याचा नियम कोणी सांगितला, धर्म लिहिणारी माणसे कोण होती, सोवळे नेसले की माणूस शुद्ध होतो अन्यथा तो अशुद्ध, ही व्याख्या कोणी ठरवली ? महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही मंदिरात सोवळ्याचा नियम नाही. अंबाबाई ही बहुजनांची माता आहे, तिला सोवळ्याने दर्शन घ्यायचे की नाही, हे बहुजन ठरवतील. आम्हाला देवीजवळ जाण्यासाठी कोणतेही दलाल नकोत, त्यामुळे पंढरपूरातील बडवे हटवले त्याप्रमाणे शासनाने पूजारी हटाओचा कायदा करण्याची गरज आहे. पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, सोवळे नसल्यास देवीचे दर्शन गाभाऱ्यात घेता येणार नाही. हा अधिकार पुजाऱ्यांना धर्माने दिला आहे, असे पुजारी म्हणत आहेत. खरेच हिंदू धर्माने एवढे अधिकार पुजाऱ्यांना दिले आहेत का, याचेही परीक्षण करणे गरजेचे आहे. धर्मातील तत्वे आचरण करण्यास कुणाचाही नकार असण्याचे कारण नाही. परंतु ही तत्वे आता कालबाहय होत असतानाही ती पाळावीत काय, असा एक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच अंबाबाईची पुजा अर्चा व स्नान, वेशभुषा आदी करण्यासाठी पुरुष पुजारी आहेत, हे मंदीर समितीला कसे चालते ?                           हिंदूंनाच मंदिरात दर्शन घेण्याचा अधिकार नसेल, तर पुजाऱ्यांचा विशेष धर्म देवळांचा आहे की मानवतेचा, असेही अनेक प्रश्न उपस्थित होतात. प्रबोधकार ठाकरे यांनी मंदिरे आणि त्यातील पुजारी यांच्याबाबत परखड असे पुस्तक लिहिले आहे, ते म्हणजेदेवळांचा धर्म आणि धर्माचीं देवळेहे  पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचले पाहिजे, असे वाटते. आजच्या पिढीने हे पुस्तक, सुमारे ८० वर्षांपूर्वी लिहिले आहे, ते अवश्य वाचावे. या पुस्तकात हिंदू धर्मातील पाखंडी व्यवस्था व धर्माच्या ठेकेदारांनी हिंदू धर्म कोणत्या थराला नेला आहे, याचे समग्र दर्शन दिसते. कोणतीहि कल्पना प्रथमतः कितीहि चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली, तरी काळ हा असला इलमी जादूगार आहे की आपल्या धांवत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून, त्या कल्पनेला सुद्धां उलटी पालटी करून टाकतो. काळ हा अखंड प्रगतशील आहे. निसर्गाकडे पाहिलें तरी तोच प्रकार. निसर्ग धर्मानुसार, कालगतीबरोबरच सर्व काही बदलत आहे. बदल हाच निसर्गाचा स्वयंभू गुणधर्म आहे. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळें झपाझप मागें पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना, ती जर दगड धोंड्याप्रमाणें अचेतन अवस्थेंत असेल तर, प्रगमनशील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यांत काहींच चुकीचे नाही. ज्या गोष्टी वा विचार कधीही बदलत नाहीत,त्या नंतर काळाच्या ओघात गंजून जातात, लय पावतात. उत्क्रांतीच्या प्रवाहात मानवाने काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचार विचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाहीं, तर कालगतीच्या चक्रांत त्यांच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्याशिवाय रहाणार नाहीत.
पूर्वीच्या काळीं मोठ्या पुण्यप्रद वाटणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील, तर केवळ जुनें म्हणून सोनें एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे माजविणें, म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखें आहे. प्रबोधनकारांनी धर्माची देवळे आणि देवळांचा धर्मया पुस्तकात लिहिले आहे, “भटेत्तरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडांत देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ति ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदुधर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचें जे आलय - वसतिस्थान - ते देवालय. आमचें तत्त्वज्ञान पहावें तों देव चराचर व्यापुनिआणखी वर दशांगुळें उरला’. अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बौद्ध धर्म हिंदुस्थानांतून परागंदा होईपर्यंत (म्हणजे इसवी सनाचा उदय होईपर्यंत) तरी भारतीय इतिहासांत देवळांचा कोठेंच कांहीं सुगावा लागत नाहीं. मग तोंपर्यंत आमचे हे हिंदु देव थंडीवार्यांत कुडकुडत आणि उन्हातान्हांत धडपडत पडले तरी कोठें होते? विद्वान संशोधकांच्या मतें, आर्यांच्या ऋग्वेदकाळाची गणना जास्तींत जास्त इसवी सनापूर्वी ७००० वर्षे धरलीं, तर इतकीं वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठें ? आजचा त्यांचा देवळांतला थाट पाहिला, तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचाईत पण या देवांना सकाळची न्याहरी, दुपारी पंचपक्वानांचे भरगच्च ताट, पुन्हा तीन प्रहरी टिफीन आणि रात्री जेवण! याशिवाय दिवस सुना जायचा नाहीं. याशिवाय काकडआरत्या, माकड आरत्या, धूपार्त्या, शेजार्त्या, आहेतच. कोट्यवधि गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळु हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यांत गोणपाटाचें ठिगळहि मिळण्याची पंचाईत; पण आमच्या देवांना छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांशिवाय भागायचेंच नाहीं. खुशालचेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणार्या देवांची स्थिति देवळें निर्माण होण्यापूर्वी कशी असावी, याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी तत्कालीन  महारवाडे, मांगवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय ? सारांश, प्रत्येकाने आपापली एक ठराविक धंद्याची जातच बनविली; आणि बहुजन समाजांतले पुष्कळ हुषार लोक देवळाच्या या बैठ्या परंतु किफायतशीर धंद्यात घुसले.” प्रबोधनकारांनी वर्णन केलेली ही परिस्थिती आजही तशीच असल्याची प्रचिती वेळोवेळी येत आहे. धर्म हा माणसांसाठी असतो, तो विशिष्ट घटकांसाठी नाही. धर्माचा उदय झाल्यानंतर मानवाने देवळांची निर्मिती केली असून जर देवळांमध्ये मानवता नसेल तर देवळांचे कार्य नक्की कुणासाठी सुरु आहे, असा प्रश्न निर्माण होतो. भारतात अनेक मंदिरांमध्ये अब्जावधी पैसा, सोनेनाणे जमा होते. परंतु त्याचा वापर गोरगरीब, अनाथ, अपंग, वंचित लोकांच्या कल्याणासाठी अथवा सामाजिक कामांसाठी का होत नाही, याचा विचार नव्या पिढीने करण्याची खास गरज आहे. शबरीमला वाद असो की शनि शिंगणापूर किंवा कोल्हापूरमधील मंदिरातील वाद असो, समाज आज बदलत आहे. स्त्री, शूद्र सारे एकाच पातळीवर आले आहेत. धर्म आणि देवळांमधील व्यवहारांचा तिढा ज्या दिवशी मिटेल, तो दिवस हिंदू धर्माच्या प्रगतीसाठी पहिले पाउल असेल, असे वाटते. 


                                                     अशोक सुतार
                                         8600316798   



VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर