Saturday, 9 May 2020

प्रदूषणाचा कोरोना रुग्णांवरील प्रभाव


प्रदूषणाचा कोरोना रुग्णांवरील प्रभाव

8600316798/ ashoksutar1973@gmail.com




ब्लॉगर अशोक सुतार 











                कोरोना प्रसाराचा वायूप्रदूषणाशी, विशेषतः मोटार, बाईक व इतर वाहनांच्या व उद्योगांच्या प्रदूषणाशी आणि बांधकामाच्या धुळीशी  संबंध आहे काय यावर आता चर्चा सुरु झाली आहे. कोरोना नियंत्रणात आलेला नसताना लाॅकडाऊन उठवल्यास किंवा शिथील केल्यास अनर्थ होईल. कारण लॉकडाऊनमुळे लोकांचा संपर्क तुटतो. लोकांचा संपर्क तुटल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही. लॉकडाऊन सुरु असल्यामुळे देशात कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. लॉकडाऊन हा कोरोना घालवण्याचा उपाय असला तरी प्रदूषण थांबवणे हा एक मोठा उपाय आहे. अर्थात लॉकडाऊन जगातील देशांमध्ये सुरु असल्यामुळे आणि उद्योग, कारखाने बंद असल्यामुळे हवामान स्वच्छ असल्याचे दिसत आहे. प्रदूषणाची पातळी कमी झाली असून सर्व देशांतील हवामान पर्यावरणदृष्ट्या चांगले असल्याचे हवामान तज्ञानी मान्य केले आहे. लॉकडाऊनच्या काळात माणसे वाहने रस्त्यावर आणत नाहीत, परिणामी हवा स्वच्छ आहे. म्हणून लाॅकडाऊन कठोर करणे आवश्यक आहे. सजीवांचा श्वसनमार्ग व फुफ्फुसे निरोगी असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्राणवायू पुरवणारी झाडे व पानांतील हरितद्रव्य वाढले पाहीजे. हरितद्रव्यावर दुष्परिणाम करणाऱ्या  रासायनिक फवारण्यांना आपण विरोध केला पाहिजे. नागरिकांना आणि शासनाला याची माहिती तात्काळ होणे आवश्‍यक आहे. प्रदूषणामुळे कोरोना रुग्णांवर घातक परिणाम होऊन वातावरण आणखी दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी, प्रदूषण राखा आणि आरोग्य सांभाळा, असा सल्ला दिला आहे.                                                                                                                                                  कोरोनाशी संबंधित नवनवीन संशोधन सुरू असताना वायू प्रदूषणाचाही कोरोनाशी संबंध असल्याचे संकेत मिळत आहेत. दुषित हवेमुळे कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होण्याची जोखीम वाढत असल्याचा निष्कर्ष दोन संशोधनांमध्ये तज्ञानी काढला आहे. प्रदूषणाचे प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये असे आढळून आले आहे की, प्रदूषणाशी संबंधित आजार असलेल्यांमध्ये कोव्हिड-19 ची गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. असे असले तरी प्रदूषणाचा कोव्हिड-19 शी थेट संबंध आहे, असे खात्रीशीरपणे सांगता येत नाही, असे आरोग्यविषयक तज्ज्ञांना वाटते. कोव्हिड-19 पूर्वी ज्या भागांमध्ये हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले त्या भागांमध्ये या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 15 टक्क्यांनी जास्त असल्याचे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. लोकसंख्येची घनता आणि हवेत पीएमटू कणांचे प्रमाण जास्त असणाऱ्या भागांमध्ये कोव्हिड-19 आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अहवालात म्हटले आहे. पीएमटू कणांमुळे फुफ्फुसाचा संसर्ग आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचीही शक्यता असल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. याविषयी बोलताना लडविग मॅक्सिमिलन युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिचच्या प्राध्यापिका अॅनेट पिटर म्हणतात, हवेतल्या पीएमटू कणांमुळे कोव्हिड-19 संसर्गाची तीव्रता वाढू शकते, या आमच्या हायपोथिसिसला बळ देणारे हे संशोधन आहे. याचाच अर्थ प्रदूषित परिसरामधील कोव्हिड-19 चे रुग्ण धोकादायक वातावरणात राहत आहेत. प्रदूषण हे मानवाच्या जीवनाला घातक असल्याचे दिसत आहे.                                                                                                  संशोधक प्रा. फ्रान्सेस्का डॉमिनिकी म्हणतात, या जागतिक आरोग्य संकटाच्या काळात प्रदूषणासंबंधीचे नियम शिथील करण्याचा संबंधितांचा विचार सुरू आहे. मात्र, आमच्या या अभ्यासानंतर हवा अधिक प्रदुषित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी आशा आम्हाला वाटते. हवेचे  प्रदूषण आणि कोव्हिड-19 यासंबंधी इटलीतल्या युनिव्हर्सिटी ऑफ सिएन्नामध्ये आणि डेन्मार्कमधल्या अॅरहस युनिव्हर्सिटीमध्येही एक संशोधन करण्यात आले आहे. इटलीच्या उत्तरेकडच्या भागात प्रदूषणाचे प्रमाण खूप जास्त आहे आणि कोव्हिड-१९  मुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही याच भागात सर्वाधिक आहे. या दोघांमध्येही संबंध असल्याचे  या विद्यापीठांनी केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. इटलीच्या उत्तरेकडच्या लोम्बार्डी आणि ईमिलिया रोमॅग्ना या दोन प्रांतांमध्ये कोव्हिड-19 चा मृत्यूदर सर्वांत जास्त तब्बल १२ टक्के आहे. तर उर्वरित इटलीमध्ये कोव्हिड-१९ चा मृत्यूदर ४. ५ टक्के आहे. सायन्स डिरेक्ट जर्नलमध्ये छापून आलेल्या या संशोधनात म्हटले आहे, इटलीच्या उत्तरेकडच्या भागातली हवा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित आहे. कोव्हिड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये हादेखील एक अतिरिक्त घटक असू शकतो. अर्थातच लोकसंख्या, वय, आरोग्य यंत्रणा आणि प्रतिबंधात्मक उपाय या बाबीदेखील यात महत्त्वाच्या आहेत. दरम्यान तिकडे फिलिपिन्समध्ये असोसिएशन फॉर रेस्पिरेटरी केअर प्रॅक्टिश्नरचे सिझर बिगीशन सांगतात, आमच्या प्राथमिक माहितीत असे दिसून आले आहे की, देशात कोरोनामुळे जेवढे मृत्यू झाले आहेत त्या सर्वांना आधीच काही आजार होते आणि त्यातले बहुतांश आजार हवेच्या प्रदूषणाशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी ७० लाख लोक दगावतात. शिवाय, जगातली ९० टक्के लोकसंख्या अशा ठिकाणी राहते, जिथे हवेच्या प्रदूषणाची पातळी त्याच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या पातळीपेक्षा जास्त आहे. विशेषतः गरीब देशांमध्ये २०१९ च्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार, वायू प्रदूषणाचे प्रमाण जास्त असणारी सर्वाधिक शहरे  भारतात आहेत.                                                                                                        कोरोना विषाणुचा फैलाव झाला तर वायू प्रदूषणामुळे आधीच कुठलातरी आजार जडलेल्या व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास होतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी लोक सांगत आहेत. पब्लिक हेल्थ फाउंडेशन इंडियाचे अध्यक्ष प्रा. श्रीनाथ रेड्डी म्हणतात, हवेच्या प्रदूषणामुळे श्वसनमार्ग आणि फुफ्फुसाच्या पेशी डॅमेज झालेल्या असतील तर कोरोना विषाणुच्या हल्ल्याचा सामना करण्याची क्षमताही खालावेल. इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चचे (ICMR) डॉ. रजनीकांत श्रीवास्तव म्हणतात, यासंबंधी पुरेसे पुरावे नाहीत आणि आम्ही त्यादृष्टीने कुठलेच संशोधनही केलेले नाही. २००२साली कोरोना कुटुंबातीलच एका विषाणुमुळे सार्स (सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) आजाराची साथ आली होती. जगभरातल्या २६ देशात ८००० लोकांना सार्सची लागण झाली होती तर ८०० जणांचा मृत्यू झाला होता. २००३ साली लॉस एंजेलिसमधल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आलेल्या संशोधनात असे आढळले की हवेचे प्रदूषण जास्त असणाऱ्या भागांमधल्या लोकांमध्ये या आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट असते. थोडक्यात, वातावरणातील प्रदूषणामुळे फुफ्फुसांचे, हृदयाचे रुग्ण तसेच कोरोनाचे रुग्ण यांच्यावर मोठा परिणाम होतो, असे दिसून आले आहे. आत्तापर्यंत असे आढळले आहे की, कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये हृदयविकार, श्वसनाचा त्रास असलेले व मधुमेहाचे रुग्ण जास्त प्रमाणात दिसून येतात. म्हणजेच प्रदूषणाची बाधा झालेल्या रुग्णांना कोरोना लवकर होतो, असा निष्कर्ष यातून निघतो. त्यामुळे मानवाने पर्यावरण जपण्यासाठी प्रदूषण बंद करणे, कार्बन घटकाची निर्मिती करणारे कारखाने बंद करणे, विविध वायू निर्मिती ज्या कारखान्यांतून होते असे कारखाने, रासायनिक कारखाने बंद करणे, झाडे लावणे इ. सामाजिक, पर्यावरणाच्या गोष्टींशी मानवाने निगडित राहिले पाहिजे.




VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर