Thursday, 28 June 2018

आणीबाणीचा मुद्दा





            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मेळाव्यात काँग्रेसच्या घराणेशाहीची लक्तरे वेशीवर टांगली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्व.इंदिरा गांधी यांची तुलना ही थेट हिटलर याच्याशी करून आणीबाणीच्या आठवणी  उगाळल्या. कॉंग्रेसच्या काळात जणू हुकुमशाहीच होती , असे भाजापावाल्यांना म्हणायचे आहे काय , हे समाजात नाही. त्यासाठी इंदिरा गांधींची तुलना हिटलरशी करण्याचा केविलवाणा प्रकार भाजपच्या नेत्यांनी केला. हुकुमशहा कुणाला म्हणायचे ? हुकूमशहा स्वत:च्या आसपास नेहमी भक्तगणांचा गोतावळा बाळगतात. या गोतावळ्यात स्तुतिपाठक अनेक असतात. या राजवटीत सत्ताप्रमुख सोडला तर अन्य कोणालाही महत्त्व नसते. भाजपमध्ये आता हीच परिस्थिती चालू आहे. मोदी- शहानी हुकुम द्यावा आणि बाकीच्यांनी होय महाराजा म्हणून मान डोलवावी , ज्येष्ठ नेत्यांना या पक्षाने कधीच अडगळीत टाकले आहे. इतपत सत्ताधारी पक्षात सर्व काही आलबेल सुरु आहे. ही कशाची लक्षणे म्हणता येतील, निकोप लोकशाहीची की हुकुमशाहीची ?                                                                                                                                                                 इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या ‘आणीबाणी’ चे आम्ही समर्थन करतो आहोत, असे नाही. तो काल लोकशाहीला लाजविणारा होता, याबद्दल शंका नाही. आणीबाणीच्या काळात २१ महिने नागरिकांचे मूलभूत अधिकार गुंडाळून ठेवले गेले, सरकारच्या विरोधात ब्रकाढण्याची कोणाची हिंमत नव्हती. आणीबाणीच्या काळात देशाचे एकाधिकारशाहीत रूपांतर झाले. त्यामुळे लोकशाही निष्ठांचे स्मरण नागरिकांना करून देण्यासाठी आणीबाणीची आठवण ठेवणे गरजेचे असते. देशाची घटना संस्थगित करून हुकूमशाही राजवट लागू करणाऱ्या त्या घटनेचा ४३ वा वर्धापन दिन मंगळवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मेळाव्यात काँग्रेसच्या घराणेशाहीवर शरसंधान करून तो साजरा केला. आणीबाणीचा विषय निघाला, चर्चा सुरु आहे . ही चर्चा सत्ताधारी भाजपने सुरु केली आहे. साहजिकच आणीबाणीच्या घटनेचे स्मरण करताना त्या कालखंडातून सत्ताधाऱ्यांनी शिकणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला काळे धन सापडून देणार, असे म्हणत अचानकपणे  नोटबंदी जाहीर केली होती, त्यावेळेस जनता ‘आर्थिक आणीबाणी’त सापडली नव्हती काय , असा सवाल सत्ताधारयांना विचारावासा वाटतो. त्यात बँकांनी लोकांना मानसिक व शारीरिक त्रास दिला तो वेगळाच. देशातील जीवनमान दोन महिने ठप्प झाले होते, कितीतरी जणांचे धंदे बुडाले. जीएसटी कर लावून (हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठीसुद्धा ) लोकांचा असेल नसेल तो पैसा कर म्हणून जमा करण्याची अफलातून मारवाडी कल्पना मोदी- शहांचीच! जनतेला भरमसाठ कर लावून नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी रडविणारे भाजपा सरकार हे मोदींच्या नेतृत्वातीलच आहे. जीएसटीच्या जाचातून अनेक व्यापारी डबघाईला आले. आणि इकडे शहा संचालक असलेल्या सहकारी बँकांत नोटबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात(कितीतरी कोटी ) नोटा बदलून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. देशात सर्वत्र धर्माची नारेबाजी मोठ्या प्रमाणात सुरु असून अल्पसंख्यकांवर जीवघेणे हल्ले सुरु आहेत. ही कुठल्या प्रकारची लोकशाही सत्ताधार्यांकडून पोसली जात आहे ?        
आणीबाणीचे स्मरण करणे म्हणजे केवळ इंदिरा गांधी यांनी काय केले, त्या कशा कशा चुकल्या याचा पाढा वाचणे नाही. तर नेतृत्वाची पारदर्शक अशी रचनात्मक व्यवस्था तयार करणे आणि कोणा एकाचीच  एकाधिकारशाही निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे. आणीबाणीस ४३ वर्षे झाली. पण या नंतच्या काळात राजकीय व्यवस्थेत बदल काय झाला, हे पाहणे महत्वाचे ठरेल. कॉंग्रेसवर घराणेशाहीची टीका करताना भाजपात एकाधिकारशाही वाढल्याकडे मोदींचे दुर्लक्ष होत आहे. ‘आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पहावे वाकून’, अशी मोदींची विचार करण्याची पद्धत त्यांनी बदलणे गरजेचे आहे. पण पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळी हे मोदींना सांगू शकत नाहीत, अन्यथा त्यांचा आडवाणी होण्याची शक्यताच अधिक !  आणीबाणीच्या श्राद्धदिनी काँग्रेसच्या हुकूमशाही नेतृत्वाचे स्मरण केले जात असताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या नेतृत्वाचा पिंडही तपासून पाहायला हवा. आणीबाणीनंतरच्या काळात आपले राजकारण अधिकाधिक लोकशाहीवादाकडे कसे जाईल , हा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे. धर्माला विज्ञानापेक्षा जास्त महत्व देणाऱ्या विचारशून्य नागरिकांच्या, कणाहीन माध्यमांच्या आणि धर्मांध भक्तांच्या टोळ्या गेल्या चार वर्षाच्या राजवटीत तयार झाल्या असतील तर आणीबाणी प्रत्यक्षात लागू करण्याची गरजच नाही. आणीबाणीची आठवण काढून कॉंग्रेसवर टीका करण्याची संधी शोधणे म्हणजे लोकशाहीचे कर्तव्य पार पाडले असे सत्ताधाऱ्यांनी समजण्याची गरज नाही.
                                                                                                                                       -अशोक सुतार 


No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर