Thursday, 14 June 2018

पगडीचे राजकारण



 पुण्यातील राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेते छगन भुजबळ यांना महात्मा फुले यांची पगडी परिधान करण्यास सांगितले. भुजबळ यांनीही ती पगडी परिधान केली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय हलकल्लोळ सुरु झाला आहे. कोणी म्हणत आहे की, पवारांनी पगडी बदलणे इष्ट नव्हते तर कोणी म्हणत आहे की, ही समतावादी विचारधारेची पगडी  आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा हा विचार आहे, त्याला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नुकताच केला आहे. पवार यांनी आता जे एकपगडीराजकारण सुरू केले आहे ते राज्यासाठी घातक आहे एवढे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेने या प्रकरणी पवारांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. महात्मा फुले यांच्या पगडीला सेनेचा विरोध असल्यास तसे शिवसेनेने जाहीर करावे, असेही आव्हान मलिक यांनी संबंधितास दिले आहे. गेले चार दिवसांपासून पगडीवर सगळे राजकारण सुरू आहे. शरद पवार यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पगडीचा वापर करा, असे सुचवले आहे. आमचा पक्ष शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आहे. या विचाराला जे काही लोक घाबरत आहेत, ते प्रतिगामी आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ अडीच वर्षे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात होते. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना विरोधकांकडूनच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही व्यक्त केली जात आहे. भुजबळांवर अन्याय झाल्यामुळे ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी उभा असल्याचे वक्तव्य माजी मंत्री व भाजपाचे नेते एकनाथ खडसेंनी केले आहे. भुजबळांसोबत ओबीसींच्या समस्यासाठी एकत्रित लढा देणार असल्याचेही खडसेंनी जाहीर केले आहे. मुळात मुद्दा तो नाही, खडसे भाजपावर नाराज आहेत. परंतु पगडीचे राजकारण सत्ताधाऱ्यांनी जोरात सुरु केले आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. याला राजकीय किनार आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एक वर्षावर आल्या आहेत, काहीही करून राष्ट्रवादीवर जातीपातीचा आरोप करण्याची संधी सत्ताधार्यांना लाभली आहे. भुजबळ हे बहुजन समाजातून उदयास आलेले नेते आहेत. त्यांच्या निमित्ताने पवार यांनीही वेगळे राजकारण सुरु केले आहे, असे म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपावेळी व पक्षाच्या स्थापना दिवशी पवारांनी समस्त सत्ताधाऱ्यांना दिलेला हा सांकेतिक इशारा असावा. कारण देशात गेली चार वर्षे धर्मांधांचा उदो उदो चालला आहे. दलितांना सवर्णांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे. पवारांनी याबाबत सत्ताधार्यांवर वेळोवेळी हल्ले चढवले आहेत.परंतु आता त्यांनी सरळ सरळ सांकेतिक भाषेत इशारा दिला आहे, असे वाटते. तुम्ही धर्माचे प्राबल्य दाखवून आमच्यावर हुकुमशाही कराल तर फुले विचारांनी आम्ही पुढे जाऊ, धर्मांधांना धडा शिकवू असाच तो गर्भित इशारा आहे. त्याला आजची राजकीय, धार्मिक परिस्थिती कारणीभूत आहे. चार वर्षांत सत्ताधारी पक्षाच्या भक्तांनी जो नंगानाच धर्माच्या नावाखाली घातला आहे, त्याला हा इशाराच आहे.                          पुण्यातील या कार्यक्रमामध्ये पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यापुढे पुणेरी पगडी न वापरण्याच्या सूचना केल्या. यावेळी पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फुले पगडी दिली आणि यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात हीच पगडी वापरण्याचे आदेश दिले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. फुले यांची पगडी सन्मान म्हणून स्वीकारणे, गौरव म्हणून भेट देणे, यात मोठा सन्मान आहे. १९७३ च्या घाशीराम कोतवाल नाटकानंतर 'पुणेरी पगडी' प्रसिद्धला आली,से म्हणतात. पण त्यापूर्वी, पुणेरी पगडी काही लोकांना बौद्धिक मालमत्ता वाटते, हे देखील तितकेच खरे आहे. पवारांनी यापूर्वी जाहीर कार्यक्रमात जरतारची 'पुणेरी पगडी' स्वीकारून सन्मान स्वीकारला आहे. राष्ट्रीय नेतृत्व समजले जाणारे पवार आणि त्यांची ओळख शेतकऱ्यांचे नेते अशी आहे. संयमी आणि धुरंधर नेते अशी पवारांची ओळख आहे, कला, क्रीडा, राजकारण अशा चौफेर विषयांवर पवारांचा अभ्यास आहे, शरद पवारांच्या डोक्यात पुण्याबद्दल राग दिसत नाही, पुण्यावरील पवारांचे प्रेम सर्वांनाच माहित आहे. पुण्यात अनेक नररत्नांनी ‘पुणेरी पगडी’ वापरली होती. पण पवारांनी फुले यांच्या पगडीचा सत्ताधार्यांना दाखवून दिलेला सांकेतिक अर्थ धर्मांधांना लागावलेली चपराक म्हणता येईल. परंतु महात्मा ज्योतीराव फुले यांनी दिलेला वैचारिक व सांस्कृतिक लढा आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही लक्षात ठेवून कृती केली पाहिजे. फुले यांची ‘पगडी’ त्यांना कितपत पेलवणार हा मोठा प्रश्न आहे. असो. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या स्थापना दिनी घेतलेला ‘पगडी’बदलाच्या निर्णयातील गांभीर्य सत्ताधाऱ्यांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे.    


No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर