Sunday, 15 December 2019

हिवाळी अधिवेशन


हिवाळी अधिवेशन
updated 15 dec2019 / 6.55


आजपासून नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष सज्ज झाला असून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले असून, त्यांच्यामध्ये विसंवाद असून सरकारने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाक ला असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत असून राज्याला मंत्रीच नसल्याने विषय कुणाकडे मांडायचे, असा प्रश्न पडला असल्याचे फडणवीस म्हणत आहेत.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे. फडणवीस म्हणाले, आम्ही काळजीवाहू सरकार असताना अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसंदर्भात निर्णय घेतला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील मदत करून असेही म्हटलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले असले तरी शेतकर्‍यांना मदत करण्यासंदर्भातला निर्णय झालेला नाही. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्‍यांची चर्चा नाही. सरकार आल्यानंतर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती, पण अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीने सरसकट कर्जमाफी आणि कोरा सातबारा करण्याचे आश्वासन दिले आहे. ते कधी करणार त्याचा कार्यक्रम सरकारनं जाहीर करायला हवा. पण सरकार वेळकाढूपणा करत आहे,अशी टीका फडणवीस यांनी केली. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षे अनुभव आहे. त्यामुळे फडणवीस या हिवाळी अधिवेशनात महा विकास आघाडीच्या राज्य सरकारची कोंडी करणार हे निश्चित. परंतु फडणवीसांनी त्यांच्या कारकिर्दीत अपुरी ठेवलेली कामे विद्यमान सरकार पूर्ण करणार आहे. सरकार स्थापन होऊ न जेमतेम एक महिना होत आला आहे आणि माजी मुख्यमंत्री फडणवीसांना शेतकर्‍यांच्या प्रश्नांची घाई झाली आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात शेतकर्‍यांना मदतीसाठी पाच वर्षे ताटकळत ठेवले आणि हे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ले देत आहेत. हे अजबच म्हटले पाहिजे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्या बहिष्कारामागे सावरकरवादाचे कारण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. म्हणजेच या अधिवेशनात नवीन सरकारला कोंडीत पकडायचे यापलिकडे विरोधकांकडे नवा अजेंडा दिसत नाही.                                                                             राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले असून भाजपचे शिवसेनेसोबत सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले आहे. आपला सत्तेतील पूर्वीचा सहपक्ष शिवसेना राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तेवर आलेला पाहून भाजपेयी चिडले आहेत. देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीस मिळाले, याचा राग देंवेंद्रांच्या मनात आहेच. त्यामुळे सरकारसमोर अधिवेशनात राज्यातील झाडून सारे प्रश्न मांडून शिवसेनेची गोची करायची, असे विरोधी पक्षाने ठरवलेले दिसत आहे. या हिवाळी अधिवेशनात विरोधक गोंधळ करून कामकाज चालू देण्याची शक्यता खुप कमी वाटते. फडणवीस म्हणतात की, कर्ज असणार्‍या मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे. गेल्या पाच वर्षात भरपूर निधी राज्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक स्थितीचं कारण सांगून आणि चुकीच्या बातम्या पसरवून हात वर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ( फडणवीस यांच्या कार्यकाळात ते तसे म्हणत नव्हते. याच्याउलट, फडणवीसांनी सरकारच्या तिजोरीत पैसा उपलब्ध नसल्याची रट लावली होती, हे विशेष !) नागपूर येथे होणार्‍या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार्‍या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सावरकरवादाच्या पार्श्वभूमीवर हा बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खरे तर विरोधी पक्षाने, सरकारने काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. परंतु फडणवीस म्हणतात की, विरोधी पक्ष म्हणून आमच्या काहीच मागण्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत.(सरकार स्थापन होऊ न एक महिनाही पूर्ण झालेला नाही आणि यांना मागील पाच वर्षांत त्यांनी न केलेल्या कामांची किती बरे घाई झाली आहे ! ) असो. विरोधी पक्षाने फक्त विरोध करावा, मग तो कोणतेही कारण काढून ही मानसिकता बरी नव्हे. सरकार हिवाळी अधिवेशनातल्या कामकाजावर जनतेच्या करातील लाखो रूपये खर्च करणार आहे, पण विरोधी पक्षाला त्याची फिकीर नाही, असेच दिसते.                                                                                      काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या सभागृहात हा मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया आहे. या राहुल यांच्या वाक्यामुळे संसदेत गदारोळ उठला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना माफी मागण्यास सांगितले. यावर राहुल गांधी यांनी, आम्ही माफी मागायला राहुल सावरकर नाही,असे उत्तर दिल्यामुळे वीर सावरकरांचा अपमान सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून जे बसलेत त्यांच्या चहापानाला आम्ही जाऊ शकत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले. शिवसेनेने काँगे्रससोबत महाराष्ट्रात आघाडी केली आहे, त्यामुळे भाजपने सावरकरवादाचे निमित्त करत सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. तसेच या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या विधानावर भाजप निषेधाचा प्रस्ताव मांडणार असल्याचे दिसत आहेे. आजपासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री ठाकरे नागपूरात दाखल झाले आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे पन्नास वर्षे कायम राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.माझा आजवरचा अनुभव पणाला लावून माझ्या गोरगरीब जनतेला समाधान देण्याचा मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री म्हणून आता माझी कारकीर्द खर्‍या अर्थाने सुरु होत आहे. त्यामुळे जनतेचे आशिर्वाद कायम राहू द्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राज्यातील शेतकरी,कर्जमाफी,अतिवृष्टीबाधितांना मदत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतकर्‍यांना हमीभाव, बेरोजगारी, उद्योगधंद्यातील मंदी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जे गतवेळच्या फडणवीस सरकारने सोडवले नाहीत. आता याच प्रश्नांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपची मंडळी विद्यमान सरकारला विरोध करणार आहेत, हे अजबच आहे.

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर