Wednesday, 12 June 2019

मेघमल्हाराची धून


मेघमल्हाराची धून
By
Ashoksutar@gmail.com -


June 12, 2019 | 9:05 am






उन्हाळा संपला आहे आणि वसुंधरेला प्रतीक्षा आहे ती पावसाची. पाऊस मनामनातला, स्वप्नांतला आणि इच्छा आकांक्षेचाही. मृग नक्षत्र येते ते मुळी पावसाचा हात हातात घेऊन. पाऊस शेतकरी, कवीमनाला भावतो. पावसाचे गाव नवनिर्मितीत दंग असते. बिया मातीत रुजतात, काही झाडांवर तर काही खडकांवरसुद्धा. बियांचे रुजणे पावसाच्या आगमनाने सुरू होते.
पृथ्वीच्या गर्भाशयात बाळ श्‍वास घ्यायला सुरुवात करते. सृष्टीत जल्लोष सुरू होतो. झाडांनाही नवकांती येते. पाने हसतात, फुले गंध स्त्रवतात. तो सृष्टीचा सोहळा पाहून अशा आनंदी वातावरणात वसुंधरेला आस लागली आहे घननिळाची, त्याच्या भेटीची. जणू कृष्णसखा राधेला भेटायला आतूर आहे, असे भाव त्या आनंदघनाच्या मुखावर आहेत. सृष्टीत कुठून येतो अलगद शीतल वारा अन्‌ पिंगा घालतो वसुंधरेभोवती आणि म्हणतो, भेटावया सखा तुज येत आहे.

वसुंधरेच्या गालावर लालिमा पसरला आहे. लज्जा हा स्त्रीस्वभाव असावा. लाजवंती नेहमी सुंदर दिसते, पाहणाऱ्याला सुख देऊन जाते. तो सुखसोहळा अनुभवण्यासाठी पावसाचे गाणे ऐकावे, पावसात भिजावे, सृष्टीचे डोळे घ्यावे, जणू सृष्टीच होऊनी जावे. नदीच्या काठावर राहून नदीचे पात्र जोखता येणार नाही, तसे सिमेंटच्या बंगल्यात राहून पावसाची मज्जा अनुभवता येणार नाही. पावसाने अनेकांना वेड लावले आहे. कवींना पाऊस हवा असतो. पाऊस प्रतिभेचा स्रोत असावा, प्रतिभा म्हणजे सर्जनशील भावना, विचार आणि कल्पनामय अनुभूतींचे अतूट नाते असावे.
कवीमनातून कल्पनेचे ढग दाटून येतात, ते शब्दरूप होऊन भावविश्‍व प्रकट करतात. सर्जनशीलता म्हणतात ती हीच असावी. कवी बा. भ. बोरकर ओल्या चिंब पावसाच्या भेटीत आपली तगमग उघड करतात आणि म्हणतात, उन्हात पान, मनात गान, ओलावून थरथरते गं, नाते अपुले न्हाते गं, होऊनी ऋतुरस गाते गं. हीच ती काव्याची उत्कट प्रतिभा होय. भावनांचा पाऊस कोसळतो अंबरातून आणि ओल्याचिंब मनातून सृष्टीचे हुंकार ऐकू येतात. सृष्टीचा हुंकार म्हणजे कवितांचे गाणेच जणू. ओल्याचिंब पावसात पक्षी आनंदाने नाचत, बागडत भावविश्‍वात रममाण होतात. त्यांना कुठे जायचे, काय करायचे याचे बंधन नाही. फक्‍त आत्मानंद आणि आत्मानंद. त्यातून जगण्याचा शोध, जगण्यातील सौंदर्याचा आविष्कार, त्या आकाशापलीकडे असलेल्या निसर्गस्रोताशी एकतानता हीच अनुभूती मनास येते.
देह चिंब भिजलेला, मन स्वैर आकाशात, मीच माझा नुरलो या विश्‍वात. मीच झालो कृष्ण सखा आणि मीच राधा. जेव्हा भावनेत, त्यागात, भक्‍तीत, प्रेमात विश्‍व हरवून जाण्याएवढी एकरूपता असेल तर होते असे. तेवढी तीव्रता हवी मनात आणि पावसातही. सृष्टीतील मरगळ जाऊन नवी चेतना निर्माण होते. पावसाचे गीत सुरू झाले असून मयुराचे नर्तन सुरू आहे. जीवसृष्टी मातीच्या सुवासाने आनंदली आहे. पाने पावसात चिंब भिजण्याची मजा घेत आहेत. आभाळाला आस लागली आहे वसुंधराभेटीची. वसुंधरा प्रेमवर्षावात न्हाऊन निघत आहे. आता बिया अंकुरतील, त्यांची झाडे होतील, झाडांना पालवी फुटेल आणि झाडे वसुंधरा मातेभोवती फेर धरून नाचतील, गाणी म्हणतील. ही झाडांची, पाखरांची किलबिल ऐकण्यासाठी सारे उत्सुक आहेत.
पाऊस म्हणजे मनातले गाणे, पाऊस म्हणजे सृष्टीचा उल्हास. पाऊस असतो कधी रौद्र रूपात तर कधी महापूर घेऊन. पाऊस कोसळतो विजेसारखा झोपड्यांवर. कधी कधी डोळ्यात येतो पाऊस. पावसाची अशी अनेक रूपे आहेत, काही भली तर काही वाईट. तरीही पाऊस येण्याचा थांबत नाही. छपरा-छपरांवरून टापा टाकत पावसाचा अश्‍व दिमाखात पुढे चालला आहे. कुणीतरी आकाशातून मेघमल्हार गात आहे. मेघमल्हाराची धून आसमंतात गुंजत आहे. पाऊस सुरू आहे मनामनांत, तुमच्या आमच्या हृदयात.


No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर